प
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार कै. साहेबराव हंगरगेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा यंदाचा कै. साहेबराव हंगरगेकर स्मृती साहित्य पुरस्कार ज्येष्ठ भाष्यकवी रामदास फुटाणे यांना जाहीर झाला आहे. पुढील महिन्यात, जानेवारी 2025 मध्ये मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत हा पुरस्कार फुटाणे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
कै. साहेबराव हंगरगेकर यांच्या 39 व्या स्मृतीदिनानिमित्त कै. साहेबराव हंगरगेकर स्मृती साहित्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली. तत्पूर्वी हंगरगेकर परिवाराच्या वतीने कै. साहेबराव हंगरगेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर मराठवाडा साहित्य परिषद तुळजापूर शाखेचे अध्यक्ष अमर हंगरगेकर, पुरस्कार निवड समिती सदस्य रवींद्र केसकर यांनी स्मृती साहित्य पुरस्काराची घोषणा केली. या पुरस्काराचे हे पहिले वर्ष असून हा पुरस्कार ज्येष्ठ भाष्यकवी, चित्रपट निर्माते, माजी आमदार रामदास फुटाणे यांना जाहीर करण्यात आला. 10000 रुपये, स्मृतीचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
पुरस्कार निवड समितीत कवी नारायण पुरी (छत्रपती संभाजीनगर), साहित्यिक, कवी भरत दौंडकर (पुणे), मसाप कार्यकारिणी सदस्य दगडूदादा लोमटे (अंबाजोगाई), प्रकाशक दत्ता थोरे (सोलापूर), पत्रकार, वक्ते रवींद्र केसकर (धाराशिव) यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रदीप हंगरगेकर, सूत्रसंचालन प्रा.विवेक कोरे तर किरण हंगरगेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी राजेंद्र हंगरगेकर, दीपक हंगरगेकर, प्रदीप हंगरगेकर, किरण हंगरगेकर, मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य विजय देशमुख, जीवनराजे इंगळे, दास पाटील, पंडित जगदाळे, तुषार सुत्रावे, देवेंद्र पवार, अरुण कुलकर्णी, संदीप गंगणे यांच्यासह हंगरगेकर फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
साहेबराव हंगरगेकर यांचे साहित्य चळवळीत योगदान
तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार कै. साहेबराव हंगरगेकर तत्कालीन अविभक्त धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेतृत्व होते. हैदराबाद मुक्तीलढ्यात त्यांचा सक्रीय सहभाग होता. 1962 ते 1967 महाराष्ट्र विधानसभेचे आणि 1968 ते 74 विधानपरिषदेचे सदस्य राहिले होते. तत्कालीन धाराशिव जिल्हा आणि मराठवाड्यातील विविध प्रश्नांवर आवाज उठवण्याचे आणि ते मार्गी लागण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले लढाऊ लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख होती. धाराशिव जिल्ह्याचे राजकीय नेतृत्व करत असताना राजकारणासोबत सामाजिक, शैक्षिणक, साहित्यिक, शेती, जलसिंचन अशा विविध क्षेत्रात त्यांचे योगदान राहिले आहे. कै. साहेबराव हंगरगेकर यांच्या पुढाकारातून 1957 साली तुळजापूर येथे मराठवाडा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. तसेच वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी ग्रंथालय चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते.